आमदार खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर कामाचे सत्यजित तांबे यांच्याकडून श्रेय घेण्याचा प्रकार उघड
तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी केली आमदार तांबेंच्या खोट्या बातमीची पोलखोल
संगमनेर प्रतिनिधी (६ नोव्हेंबर २०२५): संगमनेर तालुक्यातील विकासकामांना निधी मिळवण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत १५ कामांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, या कामाचं श्रेय घेण्यासाठी नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी बनावट प्रसिद्धीचा खेळ रचल्याने त्यांच्या खोटेपणाची पोलखोल भाजप तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी केली आहे.

भाजप तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी तांबे यांच्यावर जोरदार हल्ला चढविताना म्हटलं, “तांबे यांनी खोटेपणाचा कळस गाठला आहे. जो निधी मंजूर झाला तो आमदार खताळ यांच्या पत्रांवर आणि पाठपुराव्यामुळे, पण श्रेय घेण्यासाठी तांबे हळूच मध्ये शिरतात आणि दिशाभूल करणार्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करतात. हा प्रकार म्हणजे राजकारण नव्हे तर स्वतःसाठी प्रसिद्धीची भिक मागण्यासारखा आहे
संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ हे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना तालुका स्तरीय समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी तालुक्याचा सविस्तरपणे आढावा घेत विविध ५० कामांसाठी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार यापुर्वी १० कामांसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आता पुन्हा ७६ लाख रुपये निधीच्या १५ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भात ६ मे २०२५ रोजी आमदार खताळ यांनी मंत्री अतुल सावे यांच्याकडे पत्रव्यवहार केला असल्याची पार्श्वभूमी तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी सांगितली.

दरम्यान नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे यांनी या कामाचे श्रेय घेणार्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. या कामाशिवाय इतर अनेक विकासकामे आणि निधीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न पाठीमागील काही महिन्यांपासून तांबे यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप भाजप तालुकाध्यक्ष भोसले यांनी केला. यावेळी आमदार खताळ यांनी मागणी केलेल्या विकासकामांचे पत्र आणि पुरावे भोसले यांनी दाखवले.
तसेच भोसले बोलताना पुढे म्हणाले की, “तांबे यांची अवस्था गाडीखाली धावणाऱ्या कुत्र्यासारखी झाली आहे. संगमनेरच्या प्रत्येक विकासकामावर लक्ष ठेवून ‘कुठे श्रेय मिळेल’ याचीच वाट ते बघतात. निधी आल्यावर लगेच पत्र देऊन ‘मीच केलं’ असं सांगतात. पण जर त्यांच्या पत्रांमुळेच निधी मिळत असता, तर गेल्या पंधरा-वीस वर्षांत संगमनेर तालुक्यात प्रलंबित कामं उरलीच नसती.”पदवीधर आमदार तांबे यांना यापुर्वी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना माहीत तरी होती का? सत्यजित तांबे आणि माजी आमदार सुधीर तांबे यांनी या योजनेंतर्गत संगमनेरमध्ये आजपर्यंत किती निधी आणला हे एकदा जनतेसमोर जाहीर करावे.
पदवीधर आमदाराला असा निधी मंजूर करून आणता येतो का? याचा खुलासा श्रेय लाटणार्यांनी करावा असे आवाहन तालुकाध्यक्ष भोसले यांनी केले.ग्रामीण भागाबद्दल कळवला दाखवणारे तांबे साकुर जिल्हा परिषद गटाचे सदस्य असताना साकुर गटात कधी फिरकले सुद्धा नाहीत. त्यांना आता साकुर गटाचा पुळका येऊ लागला आहे. राजकीय हेतू साध्य झाला की सर्वसामान्य जनतेला विसरणारे तांबे रुपी राजकुमार साकुरच्या जनतेने पाहिले आहेत. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तालुक्यात दुसर्याने केलेल्या कामांचे श्रेय घेण्याची धडपड सुरू असल्याची टीका भोसले यांनी केली.
भोसले यांनी तांबे यांच्या राजकीय शैलीवर टीका करताना म्हटले की, “दिशाभूल करणारे पत्र दाखवून आणि श्रेय घेऊनच तांबे यांचे राजकारण सुरू आहे. जनतेला हे चांगलंच कळतंय. म्हणूनच त्यांच्या मामाचा म्हणजे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा पराभव जनतेनं केला. पदवीधर आमदारांनी आपला नाशिक मतदारसंघ सांभाळावा, अन्यथा सुशिक्षित आणि हुशार मतदार त्यांना घरी बसवतील.”







